Saturday, 31 August 2019

तुम्हाला काही जण कूपन देतात, काही जण पैसे.. पण काही जण अजून एक सुंदर पर्याय देतात...

काल दिलेला होमवर्क कोणी केला नसेलच असं गृहीत धरून चालूया,
कारण मला फक्त एकाच मित्राने त्याचा स्कोअर कळवलाय.
आणखी कोणी स्वतःच्या स्कोअरने शरम वाटून शेअर केलं नसेल, तर काही हरकत नाही..
आपला रिसायक्लिंगचा स्कोअर कसा वाढेल याकडे आपण अधिक लक्ष देऊयात.
तर माझा स्कोअर होता १५ पैकी १३,
कारण खरं सांगायचं तर E waste मी कधीच कचऱ्यात टाकलं नाहीये, पण त्याचं करायचं काय तेही मला माहीत नव्हतं. आणि कागद मी कंपोस्ट मध्ये वापरत असल्यामुळे रद्दीत देत नाही.
या लेखाच्या निमित्ताने, मलाही नवीन नवीन गोष्टी रोज वाचायला मिळतात आणि समजतात.
तर या वेबसाईटवर जाऊन सगळं मटेरीयल वाचायला मी तुम्हाला याकरता सांगत होते, कारण, माझं काम आहे तुम्हाला घरबसल्या पर्यावरणासाठी काय करता येईल ते सांगणं. आणि या रिसायकल गुरूने ते आणखी सोप्पं करून टाकलंय.
आता ही वेबसाईट तर बंगलोर मध्ये कार्यरत आहे.
पण गूगल केल्यावर असं लक्षात आलं, की मुंबई मध्ये देखील अशा अनेक संस्था आहेत, ज्या अगदी असंच काम करतात.
कॉल दिलात की तुमच्या घरी येऊन तो पुनर्वापर करता येण्याजोगा कचरा घेऊन जाणार.
त्या बदल्यात, तुम्हाला काही जण कूपन देतात, काही जण पैसे..
तर काही जण अजून एक सुंदर पर्याय देतात,
तो म्हणजे या वेस्ट मधून मिळालेले पैसे जातात सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना, आणि त्याची पावती तुम्हांला घरपोच मिळते.
आता तुमचे आणि त्यांचे दोघांचे कष्ट आणि वेळ वाचवायला,
आपण काय करू शकतो?
तर आपण त्यांना कॉल देऊन एकदा आपल्या सोसायटीच्या मिटिंग मध्ये बोलवूयात,
त्यांना त्यांचं प्रेझेन्टेशन करूदेत.
त्यांच्याकडून जाणून घेऊयात की कचऱ्याचं विभाजन करायचं कसं?
काय रिसायकल होऊ शकतं आणि काय नाही? 

तुम्हांला पटलं, तर त्यांना तुमच्या सोयीनुसार तारखा द्या पीक-अप ( pick up ) साठी. शक्यतो एका सोसायटीने एकाच दिवशी हा पीक-अप ठेवावा.
मी मुंबईत काम करणाऱ्या काही संस्थांच्या लिंक पुढे दिल्या आहेत, त्या एकदा बघा, किव्वा तुमच्या परिसरात असं काम करणाऱ्यांना शोधा, आणि हा प्रयोग करून तर पहा.
तुम्हांला हे काही करायचं नसेल, तर आपल्या पारंपरिक पद्धतीने का होईना,
कचऱ्याचे विभाजन करून शक्य तेवढ्या गोष्टी रिसायकल करा.
पण मला वाटतं, हा टास्क जेवढा टीम स्पिरिट ने चांगला केला जाईल,
तेवढा एकेकट्याने नाही होणार.
तुम्हाला काय वाटतं?

- समिक्षा साळुंके
- ३१-०८-२०१९
...to be continued

Friday, 30 August 2019

कचरा वाला वो नही, कचरा वाले हम है ।

कचरा वाला वो नही, कचरा वाले हम है ।

आठवतोय का तो व्हिडिओ?
काही महिन्यांपूर्वी फेसबुक वर, व्हॉट्सऍप वर फिरत होता?
किती साधीशी गोष्ट आहे नाही..
पण त्यानंतर किती मनापासून आपण आपल्या भाषेत फरक घडवून आणला!

माझीही तशीच काहीशी अपेक्षा होती..
कालपर्यंत जे लेख लिहिले, त्यावर मला खूप पॉसिटीव्ह रिप्लाय आले, की समिक्षा, मी ऑलरेडी असं असं करतो, मी माझ्यातर्फे असा असा कचरा होऊ देत नाही, आम्ही असं असं विसर्जन करतो, वगैरे वगैरे...
शिवाय अनेकांनी नव्याने काही गोष्टींची सुरुवात केली, आणि मला तसं कळवलं...

वाचून ऐकून मनाला बरं वाटलं, की शेकडो पृथ्वी रक्षक ऑलरेडी तयार झालेत. 
म्हणजेच माझ्या एकीच्या लेखनाने, शेकड्याने का होईना, फरक पडला जगात...
आता मात्र हा रिले थांबायला नको, चालत राहूदेत..
तुमच्याकडून आणखी शेकड्याने फरक पडुदेत..
आता जे तयार झालेत ते आणि जे अजूनही तयार नाहीत त्यांनी,
स्वतःला एक प्रश्न विचारा..
मी पुरेसे प्रयत्न करतोय का?
Are my efforts enough?
शंकेची पाल चुकचुकली,
तर पुढच्या लिंक वर जाऊन काही प्रश्नांची उत्तरे प्रामाणिक पणे द्या,
आणि स्वतःच तपासून पहा!

शिवाय ही वेबसाईट पूर्णपणे चाळून काढा. 
काही फार नाहीये वाचायला, पण जे आहे, ते महत्त्वाचं आहे.
आणि तुमच्या मनातल्या अनेक शंकांची उत्तरं देखील तिथे आहेत.

आजच्या दिवसात एवढं कराच..पुढच्या लेखात आपण यातल्या काही मुद्द्यांवर बोलू..

- समिक्षा साळुंके
- ३०-०८-२०१९
...to be continued

Thursday, 29 August 2019

करीना कपूरची डाएटिशियन ऋजुता दिवेकर ने एक सिक्रेट सांगितलं मला त्यादिवशी...

करीना कपूरची डाएटिशियन ऋजुता दिवेकर ने एक सिक्रेट सांगितलं मला त्यादिवशी!
.
.
.
.
.
.
न्यूज चॅनेल वरच्या एका स्पेशल शो मध्ये ती म्हणत होती,
"जितना पॅकेट खुलेगा, उतना पेट फुलेगा!"
आपल्या पृथ्वीच्या आजारी पडण्यामागे पण हेच सिक्रेट कारण आहे.
पॅकेट्सचं वाढतं प्रमाण.
आता थोडंसं स्वतःकडे पाहुयात.
थोडं टोचून बोलणारे मी, पण एवढी कळ काढाच.
फॉरेन मधल्या बायका, शिकल्या, कॉर्पोरेट जॉबला लागल्या,
आणि जेवण बनवायचं विसरून गेल्या.
त्यांना आणि त्यांच्या पुढच्या पिढीला सवय लागली फास्ट फूड ची
आणि रेडी टू मेक जेवणाची.
प्लॅस्टीकच्या पाकिटातून मिश्रण पाण्यात टाकायचं, ओव्हन मध्ये टाकायचं,
कि झालं जेवण तयार.
आणि प्लास्टिकचा कचरा सुद्धा !
आपल्या बायका हळू हळू चूल आणि मूल मधून बाहेर पडत आहेत,
नोकऱ्या करत आहेत, बिसनेस करत आहेत,
आणि थकून घरी येताना अगदी जेवण रेडी टू मेक आणत नसल्या ,
तरी, धान्याऐवजी पीठं, रेडिमेड भाजण्या, साफ केलेल्या भाज्या, वगैरे आणू लागल्यात.
आणि हे सगळं येतं, त्याच्या त्याच्या प्लास्टिकच्या पॅकेजिंग मधून.
म्हणजे जो कचरा अगदी अलीकडे पर्यंत होत नव्हता, तो व्हायला लागला.
आता मी काही याचं खापर ना बायकांच्या डोक्यावर फोडणार आहे, ना पुरुषांच्या...
आता एकमेकांकडे बोटं दाखवण्याची वेळ निघून गेली आहे.
आता फॅक्ट हि आहे, कि अगदी सहज टाळता येणारा कचरा घरात येतो आहे,
आणि तो येणार नाही यासाठी काहीतरी करायला हवंय.
कोणी?
तर आपण सगळ्यांनी.
जर तुम्ही नोकरी करणाऱ्या महिला किव्वा पुरुष असाल, तर घरातल्या मुलांवर आणि मुलींवर घरकामात मदत करण्याचे संस्कार करा.
गृहिणी असलात तरीही, हे तुम्हाला लागू होतं.
सासू असाल, तर स्वतःच्या लेकाला, सुनेला घरकामात मदत करण्याचा सल्ला द्या.
कोणाचा नवरा असाल, तर स्वतःहून बायकांची अशी समजली जाणारी कामं देखील शिकून घ्या आणि शक्य तेवढी मदत बायकोला स्वतःहून करत चला.
शाळेत, कॉलेजात जाणारी मुलं असाल, तर आई वडीलांना घरातल्या कामांत स्वतःहून मदत करत चला.
घरकामं असतात किती?
देवपूजा, स्वच्छता, जेवण, बाजार आणि बिछाना.
प्रत्येकाने, आपली आपली जबाबदारी घ्यावी.
बायकोने बाजार आणला, नवऱ्याने भाजी साफ करायला घ्यावी,
नवऱ्याने साफसफाई केली, बायकोने जेवण बनवावं,
बायको भांडी घासत असेल, नवऱ्याने तोवर बिछाना टाकावा.
घरातल्या प्रत्येकाने आपलं ताट, वाटी, तांब्या, चहाचा कप स्वतः धुवून जागेवर ठेवावा.
लहान मुलांना त्यांचा त्यांचा बिछाना आणि पसारा आवरायला शिकवावा.
झाडू-लादी, टॉयलेट-बाथरूम साफ करण्याचं काम आळी - पाळीने करावं.
याने होईल काय माहितीये?
बायकांची कामं आणि कष्ट कमी होतील,
आणि त्यांना रेडिमेड काहीही आणावं लागणार नाही.
रेडिमेड आणणार नाहीत म्हणजे, प्लास्टिक घरात येणार नाही,
अल्टिमेटली प्लास्टिकचं उत्पादन कमी होईल.
अजून एक करता येण्यासारखी गोष्ट म्हणजे, सुपरमार्केट मधून पॅकेजिंग केलेल्या भाज्या, फळे, न घेता, गाडीवरून घ्याव्यात आपल्या कापडी पिशवीत.
आणि प्लास्टिक मधुन येणारे, वेफर्स, कुरकुरे, खारे शेंगदाणे, असं चकणा मटेरिअल, हौशी खवय्यांनी विकत घेण्यापेक्षा घरी तयार करावं किव्वा ड्रायफूटच्या दुकानातून सुट्ट विकत घ्यावं
(आपल्या घरातल्या पिशव्यांमध्ये किव्वा ओल्ड स्कूल स्टाईल कागदी आवरणात).
माझ्या (आयुष्यभर नोकरी केलेल्या ) आईने अजूनपर्यंत कोणाला असले चकणा आयटम खाऊ दिले नाहीत आणि विकत आणू दिले नाहीत , घरच्या घरी मक्याचे पोहे तळून त्यावर तिखट मीठ टाकलं कि झालं काम ! अर्थात घरातल्या कामात तिला आमची सर्वांची मदत असायची.
होय, बाबांची सुद्धा !
माझ्या (बँक मॅनेजर असलेल्या) सख्ख्या ताईने तिच्या बँकेतल्या कर्मचाऱ्यांना सकाळचा नाश्ता प्लास्टिकमध्ये न घेता स्वतःच्या डब्ब्यात घेण्याची सूचना केली आणि तिथे ती अमलात आणली गेली.
माझा नवरा मी घरी नसताना पोळी भाजी केंद्रातून भाज्या चपात्यांसाठी वेगळं प्लॅस्टिक न घेता, स्वतःच्या डब्यातून जेवण घरी आणतो. माझ्या या छोट्या छोट्या उद्योगांना पूर्ण साथ देतो.
आणि मी कधी आळशीपणा केलाच तर दम सुद्धा भरतो.
हि उदाहरणं देण्याचं कारण म्हणजे, 
एका बिझी मिडल क्लास कुटुंबाला देखील,
पर्यावरणाचं रक्षण करणं, सहज शक्य आहे
, हे आपल्या लक्षात यावं.
आपण शक्यतो आपल्या मुलांना बाहेरचं खाऊ देत नाही,
त्यामागे त्यांचं आरोग्य जपायचं कारण असत.
अगदी हीच गोष्ट करून आपण, आपलं आणि आपल्या पृथ्वीचं आरोग्य जपलं,
तर आपण आपल्या मुलाबाळांना एका निरोगी पर्यावरणात जगण्याची संधी देऊ शकतो.
हे तुम्हाला नको आहे का?
बघा बुवा, तुमचं डाएट पण सांभाळलं जाईल आणि
तुम्हाला पृथ्वी रक्षक म्हणून मिरवताही येईल, असा पर्याय दिलाय तुम्हाला !
तर या पुढे प्लास्टिक मधून अगदी काहीही विकत घेताना हि लाईन मनात आणा,
"जितना पॅकेट खुलेगा, उतना कचरा बढेंगा !"
आणि विचारपूर्वक योग्य त्या आणि गरजेच्या वस्तूच, योग्य त्या ठिकाणाहून खरेदी करा.
- समिक्षा साळुंके
- २९-०८-२०१९
...to be continued

Tuesday, 27 August 2019

आपली गोमाताच जर ग्लोबल वॊर्मिंगला कारणीभूत ठरत असेल तर?

गायीला आपण माता मानतो,
पण ही गोमाताच जर ग्लोबल वॊर्मिंगला कारणीभूत ठरत असेल तर?
.
.
.
.
.

आपण गाईंचे पालन दूध दुभत्यासाठी करतो.
अगदी आपल्या आजूबाजूला नसलं, तरी पृथ्वीवर अनेक देशांत, गाईचं पालन,
हे 'बीफ'साठीसुद्धा, म्हणजे मांस उत्पादनासाठी केलं जातं.
याला मागणीच जास्त असल्याने हे खूप मोठ्या प्रमाणावर केलं जातं.

आता समस्या ही आहे, की या गोमाता, किव्वा अन्य रवंथ करणारे प्राणिजन,
जेव्हा विष्ठा बाहेर टाकतात,
तेव्हा त्याच्यातून निर्माण होणारा मिथेन वायू,

हा कार्बन डायऑक्साईड पेक्षा २३ पटींनी जास्त हानिकारक आहे ,
जो कि ग्लोबल वॊर्मिंगला कारणीभुत ठरतो.
एकदम अभ्यासू लोकांनी आकडेवारी जाणून घेण्यासाठी पुढील लिंक वर जाऊन लेख वाचा.
बाकीच्यांनी माझ्यावर विश्वास ठेवा!

https://timeforchange.org/are-cows-cause-of-global-warming-meat-methane-CO2

तर आता आपण काय करू शकतो?
गोहत्या हा तर काही उपाय नाही.
पण उत्पादन कमी होऊ शकतं.
कसं?
सोप्पंय!
मागणी कमी व्हायला हवी.


बंद नव्हे, कमी.

बीफच्या दिवान्यांनी बीफ खाणे बंद करावं किंवा खूप कमी करावं.
आणि आपण बाकीच्यांनी, दुधाचे पदार्थ (dairy products) खाणे कमी करावं.

ज्यामध्ये खव्याची मिठाई सुद्धा येते बरं!

मान्य आहे , कि खाण्या-पिण्याच्या सवयी बदलायला सांगते,
म्हणजे जरा जास्तच पर्सनल होतेय मी..
पण आता हा पृथ्वी रक्षणाचा मामलाच खूप पर्सनली घेतलाय मी ..
आणि तुम्ही पण घ्यायलाच हवाय ,
कारण आता फक्त स्वतःची शुगर वाढून नव्हे ;
तर ग्लोबल टेम्परेचर वाढून जीवावर बेतणार आहे .

आणि मी दूध व दुधाचे पदार्थ खाणे बंद करा असं म्हणतच नाहीये मुळात.
आपल्याला प्रत्येकाला फक्त ते प्रमाण नेहमीपेक्षा ५०% कमी करायचंय. एवढं तर कोणालाही नक्की जमेल!


आता आपल्याला वाटेल, मी एकट्याने कमी करून थोडीच काही होणार आहे!
खरं आहे, एकाने फरक नाही पडणार, पण एक - एकाने फरक पडणार.

तुम्हाला एक ग्राहक म्हणून स्वतःची ताकद आजमावून पाहता येईल का?

जे त्या लिंकवरील लेख वाचणार नाहीयेत त्यांना मी त्यातला सारांश सांगते..

The most important conclusion for ourselves is: Eat much less meat and dairy products. This is one of the most effective ways to reduce our personal carbon footprint and to generally reduce our personal negative impact on the environment.

Finally a quote from Albert Einstein (Nobel prize 1921): Nothing will benefit human health and increase chances for survival of life on Earth as much as the evolution to a vegetarian diet.

- समिक्षा साळुंके
- २८-०८-२०१९
... to be continued

आज फक्त वेळ काढायला लिहितेय मी..

तुमच्या आयुष्यातली १७ मिनिटे एवढा वेळ काढायचाय मला, तुम्हाला काहीतरी दाखवायला.

हा एक छोटासा होमवर्क आहे आजचा.
आणि खूप मस्त आहे.

माझ्याच एक मित्राने खूप कष्टाने खूप अभ्यास करून सगळ्यांना समजेल अशा साध्या सोप्प्या भाषेत
" ग्लोबल वॉर्मिंग " म्हणजे काय भानगड तरी काय आहे, ते सांगण्याचा प्रयत्न केलाय..
तो बोलत इंग्लिश मध्ये असला तरी सांगतोय चित्रभाषेत..

त्यामुळे मन लावून ही १७ मिनिटे दिलीत,
तर तुम्हाला यापुढे येणाऱ्या माझ्या काही "आउट ऑफ द बॉक्स" पोस्ट्सचं आश्चर्य वाटणार नाही!

तुम्ही माझे लेख वाचून बोअर होत नाही म्हणजे हा व्हिडिओ पाहताना देखील बोअर होणार नाहीत, याची मला खात्री आहे.
पण जरी कंटाळा आला, तरी 'औषध कडूच असतं, पण बरं वाटायला हवंय तर घ्यायला पाहिजे' असं समजून पूर्ण डोस घ्या!

https://youtu.be/3CM_KkDuzGQ

तसंच तुमच्या मित्र परिवाराला आणि परिवाराला सुद्धा पाहायला लावा.

आणि तुमचे विचार मला कमेंट करून कळवा..
म्हणजे आपल्याला या लेखमालेची पुढची दिशा ठरवणं सोप्पं जाईल.

- समिक्षा साळुंके
- २७-०८-२०१९
...to be continued

Monday, 26 August 2019

ते राहणार आहेत तिथेच, करोडो वर्षं...

शहराबाहेर तयार होणारे कचऱ्याचे डोंगर,
त्या रस्त्याने जाताना नाक बंद करून थोडीच जमीनदोस्त होणारेत.
ते राहणार आहेत तिथेच,
करोडो वर्षं.
आपण क्रशर चालू करून,
आहेत ते डोंगर फोडतोय कशासाठी?
याच कचऱ्याच्या डोंगरांना जागा करण्यासाठी ना!
गोष्ट झाली अशी, की मी गेल्या वर्षीपासून घरच्या घरी ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट करायला सुरुवात केली.
एक दोन आठवड्यांत माझ्या लक्षात आलं,
की मी जवळ जवळ ५-६ दिवसांनीच कचऱ्याचा डबा बाहेर ठेवतेय.
कारण कचरा जास्त होतंच नव्हता,
आणि ५-६ दिवस घरात राहिला तरी नाशिवंत नसल्यामुळे, दुर्गंधीचा प्रश्नच उद् भवत नाही.
तरीही मनाला ही खंत होतीच की,
अजूनही मी त्या कचऱ्याच्या डोंगरात भर घालतेच आहे. कमी का असेना.
त्यानंतर काही महिन्यांपूर्वी फेसबुकवर एक पोस्ट पहिली, 
ज्यात एका छोट्याशा गावातल्या मुलांनी पाण्याच्या प्लॅस्टिकच्या बाटल्यांच्या विटा बनवून त्यातून त्यांची शाळा उभी केली.
आता प्लास्टिकच्या विटा ही कन्सेप्टसुद्धा मार्केटमध्ये येऊन जुनी झाली. डोक्याच्या एका कोपऱ्यात ती होतीच.
मग आला मान्सून आणि ट्रेकिंगला सुरुवात झाली. ट्रे
कर्स ज्या बिस्लेरीच्या पाण्याच्या बाटल्या बसमध्ये सोडून जायचे, त्या मी बॅगेत टाकून आईला देण्याच्या उद्देशाने घरी आणू लागले, कारण माझी आई त्या बाटल्या कापून त्यात भाज्यांची रोपं लावायची. 
पण मग त्या बाटल्यांचा वरचा भाग पुन्हा कचऱ्यात जायचा.
तर काही दिवसांपूर्वी पोळ्या लाटताना असंच विचारचक्र चालू झालं डोक्यात, आणि लिंक लागली..
थोडी ट्युबलाईटच आहे बरं का मी!!
या बाटल्यांमध्ये घरात येणारं पुनर्वापर न करता येणारं प्लॅस्टिक, ठासून ठासून भरायचं, की झाल्या प्लास्टिकच्या विटा तयार!
अशा विटा तयार करणाऱ्या आणि संकलित करणाऱ्या संस्था अनेक आहेत, तिकडे नेऊन तुम्ही या विटा दिल्यात की त्यांचा योग्य तो वापर होईल, याची खात्री आहेच की!
आणि डोन्ट वरी, अशी एक वीट तुमच्याकडे तयार व्हायला अनेक दिवस जातील, हे मला अनुभवाने समजलंय. गेल्या एक महिन्यात माझ्याकडच्या एका बाटलीत फक्त एक हॅन्डवॉशचे रिफिल पॅकेट आणि एक खाकऱ्याचे पाकीट गेले आहे.
अर्थात या रिझल्टसाठीसुद्धा बऱ्याच महिन्यांची प्लॅस्टिकमुक्त साधना लागते.
पण तोपर्यंत हे करून तर पहा!!
काही खूप मोठा टास्क नसणार आहे हा.
अगदी लहान मुलांचा खेळ आहे.
तो हवं तर घरातल्या छोट्या मुलांनाच द्या करायला.
नक्कीच जमण्यासारखं आहे.
आणि एक छोटुसा होमवर्क द्या तुमच्या मोबाईलवेड्या नेक्स्ट जनरेशनला..
प्लॅस्टिक ब्रिक किव्वा इको ब्रिक्स बद्दल शक्य तेवढं जाणून घेण्यासाठी गूगल करूदेत त्यांना.
त्यावरील व्हिडिओ त्यांच्यासोबत एकत्र बसून पहा आणि कृतीत आणा..
जग बदलेल हो, आधी आपण सुरुवात तर करू!

- समिक्षा साळुंके
- २६-०८-२०१९
... to be continued

मी लालबागच्या राजाशी कट्टी आहे!!

मी लालबागच्या राजाशी कट्टी आहे!!
.
.
.
.
.
.
आणि त्या सगळ्या सो कॉल्ड इकडच्या तिकडच्या राजांशी सुद्धा!
हे सगळे शहाणे मंडळ वाले, इतके चाप्टर आहेत ना.. 
पूरग्रस्तांना मदत पाठवतायत,
इको फ्रेंडली "डेकोरेशन" करतायत,
आणि फेमस होतायत. 

आणि गणेश मूर्ती?
मूर्तीचं काय?
ती कोण इको फ्रेंडली बनवणार?

८ फूट, ११ फूट, १८ फूट एवढ्या एवढ्या उंचीच्या शेकडो काय, हजारो मुर्त्या आजही आपल्या अरबी समुद्रात विसर्जित होत आहेत, आणि त्यासोबत, असंख्य झेंडू च्या फुलांनी भरलेल्या पिशव्या!!
असं कसं चालेल मित्रांनो?
आपण विषारी रसायनांनी भरलेली आपली श्रद्धा पाण्यात नव्हे, करोडो जीवांच्या घरात विसर्जित करतोय.. 
उद्या त्या जीवांनी त्यांच्या शरीरातले केमिकल्स तुमच्या घरात आणून टाकले, तर चालेल तुम्हाला? 
काय हक्क आहे आपल्याला असं वागण्याचा? 
काय समजतो तरी काय आपण स्वतःला?
टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली, ते सामाजिक संदेश देण्यासाठी..
आपण कोणता संदेश देतोय लोकांना?
आपल्या श्रद्धा परंपरांसाठी मुक्या जीवजंतूंचे प्राण घेण्याचा?
मला खूप राग आहे या गोष्टीचा, 
की ज्या गणेशावर लाखो लोकांची श्रद्धा आहे, 
ज्या मूर्तीची कॉपी करण्यासाठी लोकांमध्ये स्पर्धा आहे, त्या इतक्या फेमस मंडळाने, एकदाही आपल्या मूर्तीची उंची कमी करण्याचा, किव्वा मूर्ती POP ची न बनवण्याचा प्रयत्न केला नाही?
आजच्या काळात सुद्धा?
या वर्षी ते काय करत आहेत माहीत नाही,
पण नुसती माणसांना मदत करून तुमची पापं धुतली जाणार नाहीयेत..
पृथ्वीची मदत करणं गरजेचं आहे.
मी याबद्दल एक पत्र त्यांना टाकणार आहेच,
पण अशा ठिकाणी दर्शनाला जाणाऱ्या लोकांचा ओघ थांबायला हवा आहे.
तरच त्या पत्राला योग्य तो सपोर्ट मिळेल.
या मूर्तींची उंची कमी होऊन,
या मूर्ती जोवर मातीच्या बनत नाहीत,
तोवर अशा मंडळांना भेट द्यायची नाही.
माझ्या सांगण्याने तुम्हाला काही फरक पडत नसेल तर DNA ने कांबळींचा घेतलेला हा इंटरव्ह्यू शेवट पर्यंत वाचा, तुमचं रक्त खवळल्याशिवाय राहणार नाही!
ते काका सरळ सरळ सांगतात, आपल्या कल्चर मुळे आपण मूर्तींचे पाण्यात केले जाणारे विसर्जन थांबवू शकत नाही, आणि मूर्तीची उंचीच १८ फूट असल्याने ती नाईलाजाने POP चीच बनवावी लागते.
अरे? मग मूर्तीची उंची कमी करा ना!!
पर्यावरण हानी बद्दल त्यांना प्रश्न केल्यावर, त्यासाठी म्हणे विसर्जनानंतर समुद्राच्या पाण्याची सफाई केली पाहिजे.
पण मुळात आपल्याला ते पाणी घाण करण्याचा हक्कच कोणी दिला?
कम ऑन हं काका,
एक कलाकार म्हणून तरी तुम्ही निसर्गाबद्दल संवेदनशील असायला हवं.
तुमच्या कलेचा अपमान नाही करायचाय मला,
पण शेवटी कलाकाराची वृत्तीच त्याचं अस्तित्व असतं, असं मला वाटतं.
काही फार नाही सांगत आहे मी करायला.
आणि अशक्य पण नाहीये हे.
फक्त अशा मोठ्या गणेश मंडळांना भाव देणं बंद करायचंय आपल्याला.
आणि ज्यांची गणेश मंडळं आहेत त्यांनी आपला गणेशोत्सव इको फ्रेंडली नव्हे तर "झिरो वेस्ट" होईल याची काळजी घ्या.
माझे मित्र म्हणून एवढं तरी या गणपतीत नक्की करा, प्लिज!!

- समिक्षा साळुंके
-२४-०८-२०१९
...to be continued

सब लोग आप जैसा करे, तो जगत् का कल्याण हो जावे ।

सब लोग आप जैसा करे,
तो जगत् का कल्याण हो जावे ।

.
.
.
.
.
हे शब्द आहेत, माझ्या नेहमीच्या किराणा दुकानाच्या मालकाचे..अर्थात मला उद्देशून.

का?
प्लॅस्टिक !

दोन महिन्यांपूर्वी, माझ्याकडच्या प्लॅस्टिकच्या सगळ्या पिशव्या संपल्या.
म्हणजे, ती असते ना आपल्या सगळ्यांच्या घरात एक पिशवी , प्लॅस्टिकच्या पिशव्यानी भरलेली, ती रिकामी झाली.
कारण?
मी त्याच्या आधी जवळ जवळ ६ महिने नवीन प्लॅस्टिकची पिशवी घरात येऊच दिली नाही. तरीही, किराणा घेतल्यावर, धान्यासोबत काही पिशव्या घरात आल्याच.
आता यांचं करायचं काय?
घरातल्या बरण्या किव्वा डब्बे घेऊन त्या दुकानात जाणं, प्रॅक्टिकली शक्य नव्हतं.
मग डोक्यात आलं,
जर या पिशव्या फक्त कॅरियरचं काम करत आहेत,
म्हणजे दुकानातून सामान घरी आलं, की बरण्यांमध्ये जातंय,
तर त्या पिशव्या पुन्हा दुकानात घेऊन जाऊन, त्यात सामान आणणं, किती सहज शक्य आहे.
त्या वापरात राहतील आणि पुन्हा पुन्हा नवीन पिशव्या घरात येणार नाहीत.

मग मी हेच चालू केलं.
या आधी माझ्या बॅगेत नेहमी एक कापडी पिशवी
असायची, त्याच्या सोबत, मी घरातल्या १-२ किलोच्या अशा ४-५ पिशव्या सुद्धा ठेवू लागले.
बाहेरून येता येता जरी काही आठवलं,
तरी सहज आणता येईल,
घरी येऊन पुन्हा जावं लागू नये म्हणून.
आणि त्यांचं वजन असतं तरी किती?
फोल्ड होऊन छान राहतात बॅगेत.

तर असंच, एकदा त्या दुकानात गेल्यावर,
त्याला रवा आणि काळ्या मणुकांसाठी त्या त्या मापाची पिशवी माझ्या बॅगेतून काढून दिली,
तेव्हा त्याचा मालक म्हणाला,
परवाच अर्धा किलो बटाट्यासाठी "वेगळी" पिशवी दिली नाही म्हणून एक गिऱ्हाईक त्याला आईबहिणीवरून शिव्या द्यायला लागला.
अगर सब लोग आप जैसा करे,
तो जगत् का कल्याण हो जावे ।

बस, मला माझ्या कामाची शाबासकी मिळाली!
आणि तुम्हांलादेखील असं करण्यासाठी आग्रह करायचा हक्कसुध्दा मिळाला !

तर आता यापुढे नुसती एक कापडी पिशवी बॅगेत ठेवतो म्हणून टिमक्या मिरवून दाखवू नका,
त्या सोबत या घरातल्या प्लास्टिक च्या पिशव्यांना कामाला लावा.

आणि खरंच जेव्हा महिन्याचा किराणा भरायला आपण घरातून निघतो, तेव्हा आहेत नाहीत तेवढ्या सगळ्या पिशव्या घेऊन जायचं आणि भरपूर शॉपिंग करायची!

आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा प्रकारे पिशव्या घेऊन डी मार्ट किंवा रिलायन्स च्या सुपर मार्केट मध्ये जाताना सुद्धा लाज बाळगू नका.
तुम्ही रक्षक आहात आपल्या पृथ्वीचे!
त्याचा अभिमान बाळगून, तिकडची सिस्टिम बदलायला त्यांना भाग पाडा.
सगळ्यात सोपा उपाय म्हणजे,
शक्यतो पॅकिंग न केलेले सुटे धान्य विकत घ्या.

प्लॅस्टिक बद्दल मी अजूनही बरंच लिहीन,
पण आज एवढंच!
कारण, एकदम सगळं सांगितलं,
तर विसरलं जाईल.

- समिक्षा साळुंके
- २३-०८-२०१९
...to be continued

Wednesday, 21 August 2019

काही सवयी बापजन्मात बदलता येणार नाहीत, तरीही तुम्ही प्रयत्न करता.


आता मी एवढी पृथ्वीची लढाई वगैरे शब्द टाकून चार लेख लिहिले,
त्यावर पुढील काही पोस्ट्स पाहून तुम्हाला वाटेल कि ,
हे काय भाऊ!
हे तर आम्ही रोज व्हॅट्सऍप वर वाचतोय आणि फॉरवर्ड पण करतोय.
आम्ही ऑलरेडी या गोष्टी करतोय..
जर तुमची रिऍक्शन अशी असेल, तर सर्वात आधी तुमचं अभिनंदन!
कारण तुम्ही एक जबाबदार व्यक्ती आहेत.
आता एक पाऊल पुढे टाका, 
आणखी फक्त एका व्यक्तीला तुमच्यासारखं जबाबदार बनवा.
जर तुमच्यासाठी हे नवीन असेल,
तर सर्वात आधी तुमचं अभिनंदन!!
कारण तुम्ही एक संवेदनशील व्यक्ती आहात,
आणि हि लढाई लढण्याची तुमची तयारी आहे.
तुम्हाला मी खूप ऑप्शन्स देणार आहे.
त्यामुळे एखादी गोष्ट करता आली नाही तर निराश होऊ नका.
काही सवयी सहज बदलता येतील,
काही बदलणं बापजन्मात शक्य नाही, अस वाटेल.
तरीही तुम्ही प्रयत्न कराल.
आता तुम्हाला जर असा प्रश्न पडला असेल,
कि हि कोण आली मोठी शहाणी,
" लोकां सांगे ब्रह्म ज्ञान , आपण कोरडे पाषाण "
तर तसं काही नाहीये.
मी स्वतः केलेल्या काही गोष्टींचे अनुभव तुम्हाला सांगेन,
आणि काही गोष्टी तुमच्यासोबतच मीही करून बघेन.
लक्षात ठेवा, आपल्याला थोडे थोडके परफेक्ट सैनिक नको आहेत,
आपल्याला करोडो सैनिक हवे आहेत, जे थोडे थोडके प्रयत्न करतील.
- समिक्षा साळुंके
- २२-०८-२०१९
... to be continued

ही लढाई भारतासाठी नाही, काश्मीर साठी नाही...

ही लढाई, भारतासाठी नाही, काश्मीर साठी नाही, 
.
.
.
.
.
.
तर पृथ्वीसाठी आहे.
आपल्यासारख्या अनेक प्राणिमात्रांचं अस्तित्व आपल्याला वाचवायचं आहे.
आता हा अस्तित्व हा शब्द लाईटली घेऊ नका हं.
डायनोसॉर जसे नामशेष झाले जगातून तशी आपली मानवजात आणि अर्थातच आपल्यामुळे इतर जीवसृष्टी देखील नामशेष होण्याच्या मार्गावर आहे..
आपल्या खूप सहज साध्या दैनंदिन क्रिया ज्यांचा आपण विचारही करत नाही,
त्या आता आपलं पृथ्वीतलावरील अस्तित्व मिटवणार आहेत.
गोष्टी खूप हाताबाहेर गेल्यात, असं कितीही वाटलं तरी आता स्वतःला वाचवायचं आहे.
आपण समस्या सोडवण्याची बुद्धी जन्मतःच सोबत घेऊन आलो आहोत. 
आता फक्त थोडीशी घाई करणं गरजेचं आहे.
आणि त्याकरिता मंगळावर पाणी शोधणं , हा उपाय नाही.
आपल्या राहत्या जगाला वाचवायचं आहे.
तुम्ही एका मोठ्या सैन्याचा भाग बनू शकता,
अगदी छोट्या छोट्या सवयी बदलून,

हो ; अगदी घरी बसून.
काय करायचं, ते मी एक एक करून पोस्ट करणार आहे.
काही गोष्टी मी खूप आधीपासून करत आहे.
पण एक खरं सांगू? 
तुमच्यासोबतच मी सुद्धा काही नवीन गोष्टी करायला सुरुवात करणार आहे.
तुम्हाला जेवढ शक्य आहे, तेवढच करा, पण नक्की करा.
आणि फक्त अजून एका व्यक्तीला त्यांची फक्त एक सवय बदलायला भाग पाडा.
तुमच्या मनातली तळमळ जास्त असेल, तर तुम्ही एक पाऊल अजून पुढे नक्की टाकाल,
आणि हीच तळमळ जर तुम्ही अजून एखाद्याच्या मनात निर्माण केलीत,
तर ते सुद्धा आपणहून एक पाऊल पुढे टाकतील.
बस !!
एवढ तर आपण नक्की करू शकतो...
- समिक्षा साळुंके
- २१-०८-१९
... to be continued

मी काही शाडूच्या मूर्तींचे गुणगान करणार नाही..

आता मी आहे हिंदू,
त्यामुळे पहिला घाला, हिंदू सणांवरच घालणार!!
.
.
.
.
.
हे माझ्या लिंक ला तोडून आहे, पण जरा अर्जंट आहे,
म्हणून आजच टाकतेय.
कोणी मला काही बोला,
प्रत्येकाला मनातून हे माहीत आहे,
की POP च्या मूर्तींचे कोणत्याही प्रकारच्या पाण्याच्या प्रवाहात विसर्जन,
हे पाण्यातील जीवजंतूंसाठी घातक आहे.
इतकंच काय, बाप्पाला मोडक्या तोडक्या अवस्थेत समुद्रकिनाऱ्यावर पाहणं,
हे आपल्या मनालाही जाचक आहे!
आता मला काही त्यासाठी वेगळे व्हिडीओ बनवण्याची गरज नाही.
आपण हे वाचत आहात, म्हणजे आपण तेही पाहिलेच आहेत.
बर मग? आता कधी सुधारायचं ठरवलंय?
मुहूर्त काढायचा का?
चला काढूयात..
या गणेश चतुर्थी चा मुहूर्त..
तर मग, यावर्षी POP ची मूर्ती विकत घेऊ नका,
बुक केली असेल तर रद्द करा आणि...?
आणि काही नाही, मी काही शाडूच्या मूर्तींचे गुणगान करत बसणार नाहीये. 
कारण, शाडूच्या मूर्त्यांचे वेगळे कार्बन फुटप्रिंट्स आहेत.
पर्याय दोन आहेत.
एक, "ट्री गणेश" ची कन्सेप्ट अमलात आणणे,
जेणेकरून, पाण्यामध्ये विसर्जित केलीत, 
तरी कोणतेही विषारी रंग त्यात विरघळणार नाहीत, 
किव्वा झाडं लावली जातील.
दुसरा पर्याय ना, मस्त, सगळ्या दृष्टीने सोयीचा आहे..
दरवर्षी, एकच धातूची मूर्ती बसवत चला !
साधारण १-२ फुटांची, चांदी, सोनं, पितळ, तांबे, पंचधातू, जी हवी ती..
तुळशीजवळ नेऊन तिचं परातीत किव्वा मोठ्या भांड्यात विसर्जन करावं, आणि पुन्हा जागेवर ठेवून द्यावी!
आणि सगळ्यात बेस्ट पर्याय म्हणजे, 
देव्हाऱ्यातली गणपतीची मूर्ती बसवणे.
आपलं, सगळ्यात सेफ.
आता तुम्ही म्हणाल, समिक्षा अशी का हातघाईवर आल्यासारखी करतेय, पुढच्या वर्षीपासून करू बदल.
या वर्षी तर आम्ही बुक केली बाबा POP ची मूर्ती,
तिचे पैसे वाया घालवायचे का?
प्रश्न पैशांचा असेल तर, चला अजून एक पर्याय देते तुम्हांला...
POP ची मूर्ती आणा,
पण विसर्जित न करता, दरवर्षी वापरा किव्वा दान करा.
प्रश्न श्रद्धेचा, परंपरांचा असेल, उंची वगैरे कमी करायला कचरत असाल,
तर घ्या त्या उंचीचा मातीचा गणपती विकत..!!
नाहीतरी परंपरेप्रमाणे, तो काही POP चा नव्हता बनत.
मी एवढी घाई करण्याचं कारण हे आहे,
की गोष्टीच आता हातघाईवर आल्या आहेत.
आपण घरातल्या लहान मुलांसमोर कसं ज्ञान पाजळतो..
कल करे सो आज कर, आज करे सो अब..
करा मग 'अब ' तुम्ही पण!!
मी हे हक्काने बोलू शकते, कारण,
मी आणि माझ्या भावंडांनी मिळून अनेकांना हे बदल सुचवले,
त्यांना ते करायला भाग पाडलं,
आणि त्यांनी ते आचरणात आणायला सुरुवात केली.
माझ्या सख्ख्या मावशीने, आमचं ऐकून, ट्री गणेशाची मूर्ती आणली.
तिने नेहमीपेक्षा मूर्तीची उंची सुद्धा कमी केली,
आणि थर्मोकोलचे मखर आणणं बंद केलं.
सोप्पं नसतंच,
सो कॉल्ड (अंध)श्रद्धांना श्रद्धांजली देणं,
पण शक्य आहे. 

पर्याय तर आहेत, ते लागलीच अमलात आणायला हवे आहेत. 
जमेल ना आपल्याला?
हीच गोष्ट दुर्गापूजेसाठी सुद्धा, बरं का.
असो, कोणाच्या धार्मिक भावना, दुखावल्या गेल्या असतील, तर...
आतातरी आम्हाला असं काही बोलावं लागणार नाही, याची काळजी घ्या.
आपल्या भावनांपेक्षा, चालीरीतींपेक्षा आता ना ,
आपलं पर्यावरण महत्त्वाचं आहे,
हि गोष्ट आता डोक्यात फिट्ट बसवा एकदम..!
गणपती बाप्पा मोरया!!
- समिक्षा साळुंके
- २०.०८.१९
... to be continued

म्हणून हे "... to be continued " चं नाट्य

तर त्यादिवशी मी एक पोस्ट पहिली, 
ज्या मध्ये शेवटी तो मुलगा म्हणाला, कि 

"एक के करने से कोई फरक नहि पडता, लेकिन एक - एक के करने से फरक पडता है."
त्यामुळे आता मी ठरवलंय,
कोणी वाचो ना वाचो,
मी मनात येईल ते लिहिणार,
आणि माझ्या तर्फे जितका प्रयत्न करता येईल तितका करणार.
होतं असं, कि मला खूप काही सांगायचं असतं, त्यामुळे एकाच वेळी भराभर खूप लिहिते मी.
पण इन्साग्रामच्या काळात, कोणाचा एक मिनिटापेक्षा जास्त वेळ घेणं, म्हणजे...
म्हणून हे "... to be continued " चं नाट्य !
तुम्ही हा प्रयत्न पुढे आणायचा कि नाही, ते तुमच्या हातात आहे.
हे जे आमच्यासारखे सो कॉल्ड पर्यावरणप्रेमी आहेत,
ते सुद्धा तीच मौत मरणार आहेत, जी तुम्ही.
फरक हाच आहे, 
कि ते प्रयत्न करणारे योद्धे असणार आहेत, 
आणि तुम्ही फक्त एक सामान्य माणूस.
त्यापेक्षा असामान्य व्हा, प्रयत्न करा.
- समिक्षा साळुंके
२०.०८.१९
... to be continued

माझं कोण ऐकणार?

मला ना खूप दिवस समजत नव्हतं कि माझ्या मनात निसर्गाबद्दल जे प्रेम आहे,
त्याच्यासाठी खूप काही करण्याची जी इच्छा आहे, ते मी करतच असते,
पण मी बाकीच्यांना यामध्ये कशी सामावून घेऊ?
माझं कोण ऐकणार?
मी काय विचार करते याचा कोणाला इथे फरक पडतो?
मी ट्रेकिंग च्या निमित्ताने प्रत्येक आठवड्याला किमान ५० नवीन लोकांना भेटते,
तिथे मी लीडर असल्याने, मन मारून सगळ्यांना माझ्या सूचना पाळाव्या लागतात.
पण इतर ठिकाणी काय?
मी बाईक राईड चा फोटो टाकला तर त्याला शेकडो लाईक्स येतील, कॉमेंट्स मिळतील ,
पण मी पर्यावरणासंबंधी काही पोस्ट टाकली, तर मात्र लोक स्क्रोल करून मोकळे होतात.
फार फार तर ४-५ जणांचे दुख्खी चेहेरे त्या पोस्ट खाली दिसतात,
जे माझ्या एवढेच हतबल आहेत, असं मला वाटतं.
- समिक्षा साळुंके 
- १९.०८.२०१९
... to be continued

आपण खूप चांगली माणसं आहोत. निदान आपली तरी तशी समजूत आहे.

आपण खूप चांगली माणसं आहोत.
निदान आपली तरी तशी समजूत आहे.
.
.
.
.
आपलं शिक्षण चांगलं आहे,
आपले आई वडील चांगले आहेत,
आपला अक्खा फॅमिली ग्रुप चांगला आहे.
आपण कुठे पिकनिक ला गेलो तर कचरा करत नाही,
आपल्यावर तेवढे संस्कार आहेत.
आपण भाजीवाल्यांशी २ २ रुपयांची घासाघीस करत नाही,
आपल्याकडे तेवढी दानत आहे.
आपण सिग्नलवरच्या पोरासोरांकडून त्यांना मदत म्हणून काही बाही विकत घेतो.
आपण गाडीतून प्रवास करताना कुरकुरेचे पाकीट बाहेर फेकत नाही,
फक्त केळ्यच्या आणि संत्र्याच्या साली टाकतो.
हल्ली, मॉल मध्ये, किव्वा सुपर मार्केट मध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांना ५ -१० रुपये मोजावे लागतात, 
म्हणून आपण आठवणीने तिथे जातांना , घरून मोठ्या थैल्या घेऊन जातो.
आपण आपले POP चे गणपती कृत्रिम तलावात विसर्जित करतो.
म्हणजे कसं आहे ना...
आपल्याला अक्कल आहे.
आपल्यावर चांगले संस्कारही आहेत.
फक्त आपण ते योग्य ठिकाणी वापरत नाही आहोत.

- समिक्षा साळुंके 
- १८-०८-२०१९
...to be continued